‘संकल्प प्रतिष्ठान’ची स्थापना निराधार, वंचित, उपेक्षित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अहमदनगर शहरात सन २००१ साली करण्यात आली. समाजातील वेगवेगळे प्रश्न असणारी मुलं सावलीत येत गेली. काही मुलांचे आईवडील एड्स आजाराने निधन पावलेले, तर काहींच्या आईवडिलांनी आत्महत्या केलेली. काहींचे आई-वडील विभक्त झालेले तर काही मुलांचे आई-वडील मानसिक रुग्ण आहेत. अशा सर्व परिस्थितीतून आलेली, एकाकी, मानसिक दडपण असलेली, आत्मविश्वास गमावलेली, त्यामुळे विध्वंसक मनोवृत्ती बनलेली, रोगाने पिडीत असलेली मुले सावलीत येत गेली. या १४ वर्षांच्या काळात सामाजिक कृतज्ञता असणाऱ्या अनेक व्यक्तींच्या सहयोगाने, सावलीच्या कामावर विश्वास ठेवल्याने मुलांना कौटुंबिक वातावरण, चांगले शिक्षण, पोषक आहार, आरोग्याच्या सुविधा, शुद्ध पाणी, व राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन देता आली.
लोकसहभागामुळे मुलांना संगीताचे शिक्षण, संगणकाचे प्रशिक्षण, तायक्वान्दोचे प्रशिक्षण मिळते आहे. सामाजिक कृतज्ञता असणारी अनेक कुटुंबे व व्यक्ती ‘सावली’तील मुलांसाठी जबाबदारीने भक्कमपणे उभी राहिली, त्यामुळे मुलांना आज तात्पुरता निवारा मिळू शकला आहे. आज मुलांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा आहे. ही जागा ५० मुलांसाठी पुरेशी जागा नसली तरी, आजूबाजूची घरे तात्पुरत्या स्वरुपात राहण्यासाठी मिळाल्याने मुलांना कौटुंबिक वातावरण दिलं गेलं. “प्रत्येक मूल खास आहे” हा ‘सावली’च्या कामाचा मुख्य गाभा आणि “प्रत्येक मुलाचा विकास” हेच ‘सावली’चे स्वप्न आहे. मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी ‘सावली’ उभी राहिल्यामुळे ही स्वप्नं जिवंत झाली. तसेच, मुलांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण झाली. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यात काम करण्याचा दृष्टीकोन प्रत्येक मुलामध्ये निर्माण झाला. मुलांच्या उज्वल भविष्याची जबाबदारी घेण्यासाठी कुणीतरी उभे राहिल्याने मुलांना मूलपण उपभोगता आले आहे. आज ‘सावली’ची काही मुले डिप्लोमा करत आहेत, काही मुलांचे आयटीआयचे शिक्षण पूर्ण झाले आहे. आवडीनुसार मुले पदवीचे शिक्षण घेत आहे, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास, परसबाग, गो-शाला, तर काही मुले नोकरी-व्यवसाय करायला लागली आहेत. काही मुलींची लग्नं झाली असून त्या आनंदाने आयुष्य घडवू लागल्या आहेत.
असे असले तरी, आजपर्यंतचा प्रवास हा सातत्याने संघर्षाचा व तात्पुरत्या मदतीवरच अवलंबून राहिला आहे. आज या मुलांना घरातील मुलांसारखे सांभाळण्यासाठी कायमस्वरुपी मदतीचे हात नाहीत. अनपेक्षित येणाऱ्या मदतीवरच दैनंदिन गरजा पूर्ण होत आहेत. अशीच परिस्थिती राहिली, तर या मुलांना घरातील मुलांप्रमाणे सांभाळण्याचे स्वप्न अधुरेच राहील आणि समाजातील अनेक निराधार मुले सर्वांगीण विकासापासून वंचित राहतील. हीच मुले विध्वंसक दिशेने जाण्याच्या शक्यता निर्माण होतील. आपण ‘सावली’च्या या मुलांसाठी जबाबदारीने उभे राहिलात, तर मुलांचे आयुष्य चांगले आणि विधायक बनवता येईल आणि देशासाठी कार्य करणारे जबाबदार नागरिक घडवणे शक्य होईल.
मुलांना राहण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध करून देणे व मुलांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे, यासाठी अनेक मदतीचे हात हवे आहेत. अनेक लोकांच्या विश्वासातून व सहयोगातून उभे राहत असलेल्या ‘सावली’च्या कार्याची संपूर्ण माहिती घेऊन, या मुलांच्या जडणघडणीत आपण सक्रीय सहभागी व्हाल अशी आम्हाला आशा आहे.
* मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण खालील प्रकारे सहकार्य करू शकता –
१} मुलांना राहण्यासाठी मुबलक जागेची आवश्यकता आहे. साधारण पाच एकर इतक्या जागेत, निवास व्यवस्था, प्रशिक्षण केंद्र, गो-शाला, कौशल्य-विकास केंद्र, व्यवसाय-शिक्षण (प्लंबिंग, इलेक्ट्रीकल, पेंटिंग, वेल्डिंग, ऑटोमोबाईल, इ.), शेती-अभ्यास केंद्र, संगणक केंद्र, विज्ञान प्रयोगशाळा, तसेच निवासी शाळा उभी करण्याची योजना आहे.
२} रोजच्या दोन वेळेच्या जेवणासाठी, दोन वेळेच्या नाष्ट्यासाठी आपण रु.५,००१/- देणगी देऊ शकता.
३} मुलांसाठी वर्षातून दोन नवीन ड्रेस, शाळेचे दोन ड्रेस घेऊन देऊ शकता. (कृपया जुने, वापरलेले कपडे देऊ नयेत. मुलांचा आत्म-सन्मान टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.)
४} एका मुलाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन वार्षिक रु.६,५००/- देऊ शकता.
५} एका मुलाचे भोजन, शिक्षण, आरोग्य, निवास, हॉबी क्लासेस, शिकवणी, कपडे, शूज, तेल, साबण, इ. दैनंदिन गरजेकरिता आपण वार्षिक रु.४१,०००/- देऊ शकता.
६} आपला अमूल्य वेळ व कौशल्य मुलांसाठी खर्च करु शकता. मुलांना शैक्षणिक व विविध छंदविषयक मार्गदर्शनाची सतत आवश्यकता असते. आपल्या मदतीने मुले त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात आणू शकतात.
७} ‘सावली’च्या कार्याची संपूर्ण माहिती घेऊन, समाजातील इतर जबाबदार व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करु शकता.