'तरु'आई विषयी...
"आदर्श भारतीय संविधानाने आम्हाला दिलेल्या मूलभूत अधिकार व हक्कांबरोबरच नागरिक म्हणून आमचीही काही संविधानिक कर्तव्ये आहेत, याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे व ती कर्तव्ये पार पाडण्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहू..." असा विचार करणा-या नागरिकांनी मालेगांव शहरांत सुरू केलेली वृक्ष लागवड व संवर्धनाची चळवळ म्हणजेच 'तरु'आई !
'तरु'आई ही संस्था वा NGO नाहीये. 'तरू'आईची कार्यकारीणी नाहीये. नागरिक स्वतः आर्थिक दान व श्रमदान करून वृक्षलागवड व संगोपन करताहेत. 'तरु'आई हा मालेगांवमधील पर्यावरणस्नेहींचा एक छोटासा गट आहे. आपापले उद्योग, रोजी रोटी साठी लागणारे तास सोडून उपलब्ध झालेला फावला वेळ याकारणी लावावा, असे मानणारे लोकं यात आहेत. आपण खूप काही जगावेगळं करतो आहोत असा आविर्भाव यात नाही. आपण केवळ आपली जबाबदारी पार पाडत असून आपल्या यथाशक्ती आणि मतीप्रमाणे काही करण्याचा; तसेच वृक्षलागवडीच्या व्यक्तिगत छंदाला सार्वजनिक रुप देऊन व्यापकता वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न यांत आहे .
तरू म्हणजे झाड आणि हे झाड आपल्याला मायेची सावली आणि करुणेची उब देणारी मायमाऊलीच आहे, म्हणून आपण 'तरु'आई हे नामकरण केलं.
पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण या अतिशय व्यापक अशा जबाबदारीचे भान ठेवून आपल्या मालेगांव शहरामध्ये देशी तसेच पर्यावरणपूरक, जैवविविधता टिकविणा-या वृक्षांची लागवड आणि संवर्धन या छोट्या कामगीरीपुरते आम्ही आमचे ध्येय सध्या सिमित केले आहे, कारण आमची संसाधने खूपच मर्यादित आहेत.
वृक्ष लागवड व झाडांचे जतन याबाबत लोक फार संवेदनशील असल्याचे भासते , पण प्रत्यक्षात हे काम दुसऱ्या कुणीतरी करावे अशी अनेकांची अपेक्षा असते. वृक्षजोपासनेसाठी पदरचे द्यायला फारसे कुणी तयार नसतात किंवा हे काम महानगरपालिकेचे वा सरकारचे आहे असे बिनदिक्कतपणे सांगून स्वतःचे मागे ही झंझट लागणार नाही याची दक्षता घेतली जाते. म्हणून वृक्षसंवर्धनासाठी समाजाने काही द्यावे असा आमचा प्रयत्न आहे, त्याकरिता आवश्यक जनसंपर्क करणे, नागरिकांना या कामात सहभागी करणे यासाठी तरुआई प्रयत्नशील आहे. आपल्या मालेगांव शहरातील नागरिकांचा यास उत्स्फुर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.
झाडांची लागवडीसाठी निवड करतांना ती पर्यावरणपूरक असतील याची पुरेपूर काळजी आम्ही घेत आहोत. याकामी आम्हाला नाशिक येथील वृक्षमित्र श्री. शेखरभाऊ गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य वेळोवेळी मिळत आहे. झटपट वाढणारी पण स्थानिक जैवविविधता धोक्यात आणणारी झाडं लावून आपले काम अल्पावधीत ठसठसीतपणे लोकांसमोर आलं पाहीजे, असा आमचा बिलकुल आग्रह नाही. या उलट हळू वाढणारी, पण अतिशय दिर्घायुषी असणारी, प्राणवायूचे उदंड उत्सर्जन करणारी, वाटसरूंना सावली, पक्षांना खाद्य व निवारा देणारी झाडे आम्ही लावलेली आहेत आणि यापुढेही लावणार आहोत.
वड, पिंपळ, अर्जुन, चिंच, पळस, बहावा, उंबर, शिवण, सोनसावर, काटेसावर, कदंब, पुत्रंजीव, महोगीनी, वरस, भोकर, आसाना, टेटू, कुसुम, मोह, वायवर्ण (वरुण), कांचन, नागकेशर, सीता अशोक, प्लक्ष (पिंपरी), बेल, तामण, अंजन, लोखंडी, हळदू, आकाशनीम, सोनचाफा, जंगली बदाम, जांभूळ, पापडा (वावळ).... यासारखी झाडे निश्चितपणे पर्यावरणस्नेही म्हणून सिध्द झाली आहेत.
' तरुआई ' चे काम करतांना सार्वजनिक जीवनातील साधनसुचिता पाळण्याचा आमचा दंडक असेल. त्यासाठी 'तरुआई' च्या श्रमसेवेकरींसाठी खालील पथ्ये असतील.
'तरुआई' ची कुठलीही स्थावर अथवा जंगम मालमत्ता असणार नाही, त्यामुळे याबाबत अनुभवास येणारा गैरवापर टाळता येईल.
'तरुआई' चे कुठलेही बॅंक अकाऊंट असणार नाही, 'तरुआई' कुठलेही सरकारी अनुदान घेणार नाही. जो काही निधी लागेल, तो नागरिकांकडूनच जेवढा आवश्यक असेल तेवढयाच प्रमाणात गोळा केला जाईल.
'तरुआई' चे श्रमसेवेकरी 'तरुआई' शी कुठलाही आर्थिक व्यवहार करणार नाहीत.
'तरुआई' च्या कामाची दखल घेऊन भविष्यात काही मान-सन्मान , पारितोषिके मिळाली तर ते नम्रपणे नाकारून सर्व श्रमसेवेकरी कृतज्ञता व्यक्त करतील.
आपणही 'तरुआई' च्या या छोटेखानी उपक्रमात, आपल्या ईच्छेनुसार सहभागी व्हावे, अशी आमची आग्रहाची विनंती आहे.